आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित मुस्लिम नागरिक, विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित करण्यात आली.
या बैठकीस पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये बकरी ईद सण शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
पोलीस प्रशासनातर्फे शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफ जवान तसेच होमगार्ड पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत असून प्रमुख चौक, धार्मिक स्थळे व गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच “गुड मॉर्निंग स्क्वॉड” अलर्ट करण्यात आला असून समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक नाके सक्रिय करण्यात आले असून संशयित वाहनांची व व्यक्तींची तपासणी सुरू आहे. सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये शासनाच्या नियमांनुसार गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली. गोवंश हत्या कायद्याने गुन्हा असून कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला.
मुस्लिम नागरिकांना पोलिसांतर्फे खालील सूचना देण्यात आल्या :
• गोवंश हत्या कायद्याने गुन्हा आहे.
• ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच गरोदर जनावरांची कत्तल करू नये.
• उघड्यावर कत्तल अथवा मांस विक्री करू नये.
• टॅग केलेल्या जनावरांचीच कत्तल करावी.
महानगरपालिकेस खालील सूचना देण्यात आल्या :
• जास्तीत जास्त ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात यावी.
• ट्रॅक्टरला खालून व वरून काळे मेणकापड लावण्यात यावे.
• परिसरानुसार ट्रॅक्टरची फ्रीक्वेन्सी वाढविण्यात यावी.
• ट्रॅक्टरसाठी जबाबदार व प्रशिक्षित चालक नियुक्त करण्यात यावेत.
• पाण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
• कुठेही रक्त वाहून जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी.
तसेच नागरिकांनी शांतता, सलोखा व परस्पर सौहार्द कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
— जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन