Monday, 18 May 2026

बक्राईद का त्योहार, पुलिस की भूमिका जाहिर...

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व संबंधित मुस्लिम नागरिक, विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज आयोजित करण्यात आली.

या बैठकीस पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये बकरी ईद सण शांततापूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

पोलीस प्रशासनातर्फे शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून एसआरपीएफ जवान तसेच होमगार्ड पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत असून प्रमुख चौक, धार्मिक स्थळे व गर्दीच्या भागांमध्ये पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच “गुड मॉर्निंग स्क्वॉड” अलर्ट करण्यात आला असून समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात विविध ठिकाणी चेक नाके सक्रिय करण्यात आले असून संशयित वाहनांची व व्यक्तींची तपासणी सुरू आहे. सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये शासनाच्या नियमांनुसार गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती देण्यात आली. गोवंश हत्या कायद्याने गुन्हा असून कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला.

मुस्लिम नागरिकांना पोलिसांतर्फे खालील सूचना देण्यात आल्या :
• गोवंश हत्या कायद्याने गुन्हा आहे.
• ३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तसेच गरोदर जनावरांची कत्तल करू नये.
• उघड्यावर कत्तल अथवा मांस विक्री करू नये.
• टॅग केलेल्या जनावरांचीच कत्तल करावी.

महानगरपालिकेस खालील सूचना देण्यात आल्या :
• जास्तीत जास्त ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात यावी.
• ट्रॅक्टरला खालून व वरून काळे मेणकापड लावण्यात यावे.
• परिसरानुसार ट्रॅक्टरची फ्रीक्वेन्सी वाढविण्यात यावी.
• ट्रॅक्टरसाठी जबाबदार व प्रशिक्षित चालक नियुक्त करण्यात यावेत.
• पाण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात यावी.
• कुठेही रक्त वाहून जाणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी.

तसेच नागरिकांनी शांतता, सलोखा व परस्पर सौहार्द कायम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

— जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन

Saturday, 16 May 2026

नामदार गिरीश भाऊंचा बंपर महाधमाका .. अबब 4 हजार कोटी?

*वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून गिरणा खोऱ्यासाठी जलसिंचनाचे मोठे गिफ्ट, उत्तर महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प; तब्बल ४ हजार ११६ कोटींच्या कामाला सुरुवात होणार* :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
----------------------------------
नाशिक :(दि.१६/०५/२०२७) अनेक दशकांपासून पाणीटंचाई, अनियमित पाऊस आणि दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा खऱ्या अर्थाने ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ४ हजार ११६ कोटी रुपयांच्या कामाचे वर्क ऑर्डर जारी करत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला हिरवा कंदील दिला आहे.
गिरणा खोरे प्रकल्प विभाग, नाशिक यांच्या माध्यमातून मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) आणि आयसीसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाला हे काम देण्यात आले आहे. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्राच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
नार-पार-गिरणा प्रकल्पाची मूळ संकल्पना म्हणजे कोकण पट्ट्यातील आणि पश्चिमेकडे समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी वळवून ते दुष्काळी गिरणा नदी खोऱ्यात आणणे. सुरगाणा, पेठ आणि परिसरातील नदी खोऱ्यांमधील पाणी विविध धरणे, पंपिंग स्टेशन, बोगदे आणि पाइपलाइनच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रात पोहोचवले जाणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत उंबरपाडा, सारन्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या नऊ ठिकाणी धरणांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय माणखेड आणि सालभोये येथे मोठे जलसाठे उभारण्यात येणार असून अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो-मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचे जाळे तयार होणार आहे. गिरणा खोऱ्याकडे पाणी वळवण्यासाठी विशेष बोगदेही उभारले जाणार आहेत.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील  हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो. विशेषतः नाशिक, जळगाव आणि धुळे परिसरातील कोरडवाहू शेतीला मोठा आधार मिळणार असून कृषी उत्पादन वाढीस चालना मिळेल. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत होणार आहे.
गेल्या काही वर्षांत या प्रकल्पावर पर्यावरणीय मंजुरी, वनक्षेत्र, जमीन संपादन, आदिवासी भागातील पुनर्वसन आणि खर्चवाढ यांसारख्या मुद्द्यांवर मोठी चर्चा झाली होती. मात्र राज्य शासनाने प्रकल्पाला प्राधान्य देत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
--------------------------------
" *हवामान बदल, घटते भूजल आणि वाढती पाण्याची मागणी या पार्श्वभूमीवर नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प हा केवळ सिंचन प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्राच्या भविष्यातील जलसुरक्षेचा आधारस्तंभ ठरणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणारा ठरेल. राज्याचे  लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचे दूरदृष्टी व नियोजनातून हा प्रकल्प साकार होणार आहे* ". :- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. 
------------------------------------